प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 2 March 2026

भेट


काळ रेंगाळला डोळ्यांच्या त्या पापण्यांवर,
स्पर्श तुझा अजुनी जिवंत माझ्या तनुवर।

तुझ्या अवचित भेटीचे क्षण मयूरपंखी,
आजही भास त्यांचा अलवार माझ्या मनावर।

पावलांत विसावले ओळखीचे सारे रस्ते,
पाऊलखुणा सांगती त्या भेटींचे किस्से वळणावळणावर।

डोळ्यांत दाटलेला तोच प्रकाश धूसरसा,
काळही विसावला त्या आठवांच्या काठावर।

भेटतोस स्वप्नांत अवचित चांदण्यांच्या राती,
शब्दांविन अर्थ स्पर्शांतच उमटवून जातोस मनावर।

जागेपणी उरते ती हळवी जाणीव पूर्ण,
आयुष्य वाहतं पुढे त्याच जाणीवेच्या आधारावर।

शुक्रवार, २७/२/२६ ९:३० PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

No comments:

Post a Comment