क्षण येती क्षण निघून जाती,
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
तेवती पणत्यात मंद ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।
वारा येतो नी वारा जातो,
थंडावा तनास देऊन जातो।।
लाट उठते अन् लाट विरते,
सागर मात्र तसाच असतो।।
मनपटलावर विचार निर्झरती,
न कळे मूळ विचार कुठून येतो।।
येती जाती भाव मनाचे,
साक्षी अंतरी कोण बसतो।।
शब्द उमटती ओठांवरती,
अर्थ कुणी आतून देतो।।
देह चालतो काळासंगे,
जीव कुणाच्या हाकेने येतो।।
नभ पसरते अंतरी माझ्या,
सीमा कुठेच दिसत नाही।।
शोधत गेलो स्वतःलाच मी,
‘मेघ’, शोध तरीही संपत नाही।।
सोमवार, १८/५/२६ , १२:३८ PM
अजय सरदेसाई -मेघ
