प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 12 June 2026

सांजरंग

 


बाजींद वारा, समुद्र किनारा,
व्याकुळ लाटा, पुळणीच्या वाटा।
शंख-शिंपले रेतीवर पसरले,
मनमोहक हा निसर्ग सारा।।

डोंगर माथा, चिंचोळ्या रान वाटा,
झाडांची सळसळ, सरसर पानगळ।
पक्ष्यांची किलबिल,झऱ्यांची खळखळ,
निसर्गाचा आनंद, हृदयी निखळ।।

सखी पावस सर, वाराही सखा,
निसर्गाशी जडला अनोखा धागा।
एकीमुळे मनात दाटे ओलावा,
दुसऱ्यामुळे हृदयी सुखद गारवा।।

रानात जाणे कुठे बोले पारवा
मनात छेडीला कुणी मारवा।
क्षितिजावर चढला रंग केशरी,
सांज सजली घेऊन सूर मंजीरी।।

शुक्रवार,१२/६/२६ , ४:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ