प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 18 May 2026

क्षण येती क्षण निघून जाती


क्षण येती क्षण निघून जाती,
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
तेवती पणत्यात मंद ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।

वारा येतो नी वारा जातो,
थंडावा तनास देऊन जातो।।
लाट उठते अन् लाट विरते,
सागर मात्र तसाच असतो।।

मनपटलावर विचार निर्झरती,
न कळे मूळ विचार कुठून येतो।।
येती जाती भाव मनाचे,
साक्षी अंतरी कोण बसतो।।

शब्द उमटती ओठांवरती,
अर्थ कुणी आतून देतो।।
देह चालतो काळासंगे,
जीव कुणाच्या हाकेने येतो।।

नभ पसरते अंतरी माझ्या,
सीमा कुठेच दिसत नाही।।
शोधत गेलो स्वतःलाच मी,
‘मेघ’, शोध तरीही संपत नाही।।

सोमवार, १८/५/२६ , १२:३८ PM
अजय सरदेसाई -मेघ