प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 2 March 2026

वामकुक्षी



दुपारचे जेवण झाले, आता एक डुलकी पाहिजे,
वार्‍याची झुळूक अंगावर अलवार फिरली पाहिजे।

डोळ्यांच्या कडा मिटताच स्वप्नांची सावली यावी,
मनाची सारी धावपळ क्षणभर थांबली पाहिजे।

आकाशी ढग तरंगती, शांत निळी ती छाया,
छपरावर पावसाची चाहूल हलकेच लागली पाहिजे।

घड्याळाचाही काटा जरा मंद फिरला पाहिजे,
या धकाधकीच्या जगातून थोडी विश्रांती मिळाली पाहिजे।

‘मेघ’ म्हणे या भरदुपारी जीवास जरा विसावा पाहिजे,
स्वप्नांच्या या सावलीत निवांत झोप लागली पाहिजे।

शनिवार, २८/२/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ