प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 4 August 2025

उरले हाती फक्त बोचरे काटे आठवांचे.

 

प्रित फुलांचे ,हे पाश चांदण्यांचे,

गुंफले अलवार अंतरी,मायाजाळ स्वप्नांचे.

 

तु जवळ नसता,कावरा होतो जीव,

नी तू जवळ असता,गडबडते गणित श्वासांचे.

 

कल्लोळ भावनांचा मन गोंधळून गेला,

न कळे मग मला,करु काय त्या क्षणांचे.

 

हे कूंद भाव विश्व सजवले कुणी मनात,

वाटे तिथेच रहावे,हरपुन भान जगाचे.

 

पायवाट चांदण्यांची ,तरी जपुन ठेव पाय,

पुढे असेल निश्चित रान, निर्बिड आसवांचे.

 

ना ऐकले मनारे,वेड्या का लावलास जिव,

 उरले हाती फक्त बोचरे काटे आठवांचे.

 

सोमवार, ४/७/२५ , ६:५८ PM

अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment