प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday, 1 September 2026

कळत नाही... !



काही बोलायाचे आहे, काय बोलू कळत नाही,
नदीस नागमोडी वळणे, पण का? कळतं नाही।

इंद्रधनु पसरला या टोका कडुन त्या टोका कडे,
तो सप्त रंगीच का? ते अजुनही कळत नाही।

तो चकोर वेडा! चांदण्याचा तहानलेला!
ही तहान चांदण्याची काय? मज कळत नाही ।

श्रावणांत मेघ बरसतो बनांत नी पानांत,
मोरास ह्याचा घे मोठा आनंद, का ?कळत नाही ।

वैशाखात पाऊस बरसला, मातीत सुगंध दरवळला,
मन माझे का उमलून प्रसन्न झाले, खरंच कळत नाही ।

तो तृषित वैरागी एक, मी तहान फेडली,
माझेच मन तृप्त का झाले, कळत नाही।

हा कोण जाणता,अंतरात माझ्या दडला,
ज्यास सर्व उमगते, कळते! हे कळत नाही ।

मंगळवार, १/९/२६ , १०:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment