विचार तुझा मनी येता, आठवणींच्या उठल्या लाटा,
जाग्या झाल्या तरल भावना, उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
आठवतो मज दिवस तो पहिला, जेव्हा आपला परिचय झाला,
परिचयाच्या वाटेवरुनी, प्रेमाचा अंकुर उमलला.
प्रेमाचा हा अंकुर बहरला, बहरून शुभमंगल झाला,
आठवतो मज अजून सारखा, मिलनाचा तो क्षण पहिला.
प्रेमाचा हा तरू मोहरला, आल्या त्याला नव्या पालव्या,
आठवतो अजून दिवस तो मजला, दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला.
सुखी आपला संसार चांगला, नजर लागली, कसा बिघडला,
गेलीस गं तू सोडून अर्ध्यावर, जो सुंदर आपला डाव मांडला.
तरीही हा चिमणा एकला, पाखरांसाठी जगला श्रमला,
उडुनी गेली पाखरे, आता चिमणा राहिला गं एकला.
विचार तुझा मनी येता, आठवणींच्या उठल्या लाटा,
जाग्या झाल्या तरल भावना, उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
अजय सरदेसाई (मेघ)
१४/०९/१९९४ , ०८:३० PM

No comments:
Post a Comment