क्षण येती क्षण जाती,
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
पेटती पणत्यात ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
पेटती पणत्यात ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।
वारा येतो वारा जातो,
थंडावा काही काळ देतो।।
लाट उठते अन् लाट विरते,
सागर मात्र तसाच असतो।।
मनपटलावर विचार निर्झरती,
न जाणे मुळ तो कुठून येतो।।
येती जाती भाव मनाचे,
साक्षी अंतरी कोण बसतो।।
शब्द उमटती ओठांवरती,
अर्थ कुणी आतून देतो।।
देह चालतो काळासंगे,
जीव कुणाच्या हाकेने येतो।।
नभ पसरते अंतरी माझ्या,
सीमा कुठेच दिसत नाही।।
शोधत गेलो स्वतःलाच मी,
'मेघ' तरीही संपत नाही।।
सोमवार, १८/५/२६ , १२:३८ PM
अजय सरदेसाई -मेघ
